तालुक्याची समृद्ध अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल–माजी मंत्री बाळासाहेब थोरात

चुकीचे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे–माजी मंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था मोठ्या कष्टातून उभ्या केल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. तालुक्यातील बँका व पतसंस्थांमधून सुमारे 9000 कोटींच्या ठेवी असून हे समृद्धीचे प्रतीक आहे. ते मोडण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. म्हणून आपल्या तालुक्याची समृद्ध अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना संघर्ष करावा लागणार असून याचबरोबर चुकीचे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्ष स्थानिक चेअरमन सुधाकर जोशी हे होते तर व्यासपीठावर पद्मश्री रघुवीर खेडकर, ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, शंकरराव खेमनर , व्हा.चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे, संचालक किसन सुपेकर, ॲड लक्ष्मण खेमनर, शिवाजी जगताप, बापूसाहेब गिरी ,अविनाश सोनवणे, बाबुराव गुंजाळ, किसन वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, सौ कमलताई मंडलिक ,श्रीमती ललिता दिघे, विवेक तांबे, राजू गुंजाळ, भाऊसाहेब गीते ,गोरख कुटे ,मोहन करंजकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती आदी उपस्थित होते.

यावेळी बँकेचे सभासद व महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोक कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले याचबरोबर बँकेच्या उत्कृष्ट ग्राहकांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मा. मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत सुंदर आणि मोठ्या उपस्थितीच्या झाल्या आहेत. संगमनेरचा सहकार आदर्शवत आहे. बँकेचा कारभार हा अत्यंत किचकट आणि अवघड आहे. तरीही अमृतवाहिनी बँकेने अत्यंत चांगले कामकाज करत 1200 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाची हक्काची बँक म्हणून नावलौकिक मिळवला आहे

तालुक्यातील पतसंस्था व बँकांमधून सुमारे 9000 कोटींच्या ठेवी आहेत. ही तालुक्याची आर्थिक समृद्धी आहे. मात्र हे मोडण्यासाठी काही लोक काम करत आहे आणि ते टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना संघर्ष करावा लागणार आहे.

भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. जेव्हा शेतीवर ताण पडतो. तेव्हा शेतकरी आत्महत्या करतो. मंदीतही अर्थव्यवस्था टिकून आहे ते शेती व्यवसायामुळे आणि म्हणून शेतकऱ्यांना मदत करताना तातडीने दुष्काळ जाहीर केला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण विना आठ दोन लाखांची कर्जमाफी केली होती. आता महागाई वाढली आहे खतांच्या किमती वाढल्या आहेत .सरकार लाडक्या बहिणींना पैसे देते मात्र दुसऱ्या बाजूला काढून घेते.

सध्या दुष्काळाची परिस्थिती असून पिके जळत चालली आहे. पिकांना पाण्याची गरज असताना तालुक्यात विजेचा खेळखंडोबा केला जात आहे. हक्काचे पाणी डोळ्यादेखत पुढे जात आहे. पाणी पुढे गेले तर समृद्धीमुळे म्हणून पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे ते म्हणाले

तर सुधाकर जोशी म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेची उलाढाल बाराशे कोटींची असून एनपीए शून्य टक्के आहे. सर्व आधुनिक व डिजिटल सुविधा नेट बँकिंग बँकेने सुरू केली आहे .कमी जोखीम असलेली बँक म्हणून अमृतवाहिनी बँकेची ओळख असून काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरते आहे .त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगताना बँकेमार्फत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे योजना सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की अमृतवाहिनी बँकेने कोरोना काळात मला मोठी मदत केली आहे. मला मिळालेला पुरस्कार हा तालुक्याचा पुरस्कार आहे. थोरात साहेब मी माझे साहेब आहेत. त्यांच्या आशीर्वादाने आपले काम सुरू आहे .तत्व व सत्व जपणारा आपला राजा असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी बँकेच्या वतीने व्हाट्सअप बँकिंग डिजिटल बँकिंग त्याचप्रमाणे एसएमएस वर लगेच 9% डिव्हिडंट सभासदांना पाठवण्यात आला.

यावेळी नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील जोशी यांनी केले प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले तर व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा

सोशल मीडिया ही सध्या माहिती युगात प्रभावी माध्यम झाले आहे. काही बिनडोक सल्लागार काहीतरी सल्ले देतात आणि पुढचे लोक चुकीची माहिती पसरवतात असे चुकीची माहिती पसरवण्यावर कायदेशीर कारवाई बरोबर त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे असे सांगताना सध्या संगमनेर तालुक्यामध्ये उठ सूट पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. विकास कामे करण्याऐवजी फ्लेक्सचे राजकारण केले जात आहे. तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी व विजेसाठी आणि तालुक्याची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सत्व आणि तत्व जपणारे लोकनेते थोरात साहेब

तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. कोरोना संकटात व इतर काळातही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला कायम मदत केली आहे. मला मिळालेला पुरस्कार हा तालुक्याचा पुरस्कार आहे. तत्व आणि सत्व जपणारा आपला राजा म्हणजे आपले लोकनेते बाळासाहेब थोरात असल्याचे पद्मश्री रघु भाऊ खेडकर यांनी म्हटले असून यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!