अहिल्यानगरला मोठी संधी मा.मंञी बाळासाहेब थोरातांच्या नावाची दिल्लीपर्यंत चर्चा
संगमनेर (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संगमनेरचे नाव चर्चेत आले असून, अहिल्यानगर जिल्ह्याला मोठी राजकीय संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सक्षम आणि अनुभवी चेहऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यात थोरात यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. दीर्घकाळ मंत्रीपदाचा अनुभव, संघटन कौशल्य आणि ग्रामीण भागातील मजबूत संपर्क यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळू शकते, असे जाणकारांचे मत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही ऐतिहासिक संधी ठरू शकते. संगमनेर मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवत राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे थोरात जर संसदेत पोहोचले, तर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र “संगमनेर ते संसद” हा राजकीय प्रवास प्रत्यक्षात येतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.