बिबट्याला घरात जेरबंद करणाऱ्या 65 वर्षीय आजीबाईंशी डॉ.जयश्रीताई थोरात यांनी साधला संवाद
यशोधन कार्यालयाच्या वतीने सन्मान करत किराणा किट भेट
संगमनेर ( प्रतिनिधी ) खरशिंदे येथील 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड या आजीने अत्यंत धाडसाने घरात अचानक शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करत मोठा संकटाचा प्रसंग टाळला असून या लढवय्या आजीचे सर्व थरातून कौतुक होत आहे.डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आजीशी फोन द्वारे संवाद साधत आपुलकीने चौकशी केली याचबरोबर यशोधन कार्यालयाच्या वतीने आजी व कुटुंबीयांना किराणा किट देण्यात आली.

खरशिंदे येथील गंगुबाई गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन किराणा व इतर साहित्य देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात,मोसीन शेख, गीताराम पवार, सिताराम पवार, रशीद शेख, अशोक लांबहाते, निजाम पटेल, गुलाब आमीन, पीरमोहम्मद शेख, सुभाष वाडेकर,शिवा पंडित,सोनू पंडित,साहेबराव पवार,नाना सय्यद,भाऊ शेख,रामनाथ वाडेकर, मीराबाई वाडेकर,अण्णासाहेब कोळसे,मधुकर गायकवाड,संदीप गायकवाड,सदाशिव पवार,रामदास काकड, हर्षल काकड यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

घरामध्ये अचानक शिरलेल्या बिबट्याच्या धोका ओळखून प्रसंगावधान राखत 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड यांनी अत्यंत धाडसाने या बिबट्याला घरात कोंडून घेतले. यामुळे मोठे संकट टळले असून या धैर्याने संपूर्ण तालुक्यासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. या घटनेची चौकशी करत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आजीच्या धाडसाचे कौतुक केले. याचबरोबर यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून किराणा किट व इतर साहित्य त्यांना देण्यात आले.

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्या डॉ.जयश्रीताई थोरात यांनी फोन द्वारे अत्यंत आपुलकीने 65 वर्षीय गायकवाड आजीबरोबर संपर्क साधला. यावेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आजीने केलेल्या धाडसाचे कौतुक करून नव्या पिढी पुढे तुम्ही आदर्श उभा केला तुम्हाला नक्की भेटायला येते अशा त्या म्हणाल्या.
तर 65 वर्षी आजी म्हणाल्या की, मी बिबट्या पाहिला तेव्हा मला वाटले की हा वाघ आहे. हा आपल्यावर चालून येईल घरामध्ये लहान मुले आहे तेव्हा तो घरात शिरला आणि मी धाडसाने दरवाजा बंद केला. त्याने डरकाळी दिल्या परंतु मी घाबरले नाही. अत्यंत ताकतीने दरवाजा बंद केल्याने तो आत मधून मोठ्याने ओरडत होता. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि मग आम्हाला धीर आला.
यावेळी शरद नाना थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा वावर जास्त वाढला आहे. याबाबत वेळोवेळी जनतेने आवाज उठवला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे तालुक्यात अनेक जणांचे बळी गेले आहे तरीही प्रशासनाला जाग येत नाही. आजीच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली असून वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी गावातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजीने केलेल्या या धाडसाचे सर्व तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.
