- चक्रीवादळ ‘मोंथा’चा इशारा – राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट !
मुंबई (प्रतिनिधी) – यंदाच्या हंगामात पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवली असून अजूनही पावसाचा जोर कमी झालेला नाही. आता पुन्हा एकदा ‘मोंथा’ या नव्या चक्रीवादळामुळे राज्यात तुफानी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
तज्ञांच्या मते, चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार वारे, समुद्रात उंच लाटा आणि अंतर्गत भागातही विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


