फुकट श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न; तळेगाव पाणीपुरवठा योजना अखेर सुरळीत
संगमनेर / प्रतिनिधी
तळेगाव पाणीपुरवठा योजना अखेर सुरळीत सुरू करण्यात आली असून, यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने हालचाली गतिमान केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काही जणांकडून या कामाचे फुकट श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

योजना सुरळीत सुरू झाल्यानंतर तळेगाव-वडगावपान गटाचे नेते बाबा पॅटर्न तसेच उपसरपंच भाऊसाहेब आहेर वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात तळेगावचे मा.सरपंच मयुर दिघे,भाजापाचे युवा नेते डाॅ.सतोष डांगे, दत्ताञय दिघे,उत्तमराव दिघे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन योजना तातडीने सुरू ठेवावी व नियमित पाणीपुरवठा करावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, योजना पुन्हा कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनानेही भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.

यावेळी बाबा पॅटर्नचे शिवाजी आहेर बोलताना म्हणाले की, “काही जणांचे कोणतेही योगदान नसताना केवळ सोशल मीडियावर पोपटपंची करत फुकट श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्षात नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यापेक्षा काहींना प्रसिद्धीचा हव्यास अधिक दिसून येत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
