शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

तळेगाव दिघे व पारेगाव खुर्द येथे महावितरणच्या प्रत्येकी ५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन

संगमनेर ( प्रतिनिधी )  दि. १७ :-
शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. यासोबतच दमणगंगा-वैतरणा-गोदावरी प्रकल्पाचे पाणी थेट तळेगाव परिसरापर्यंत आणून या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यावर शासनाचा भर आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महावितरणच्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच पारेगाव खुर्द येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमोल खताळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी,नियोजन समितीचे विठ्ठलराव घोरपडे शिवसेना नेते राजाभाऊ सोनवणे,भाजापाचे भिमराज चत्तर सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, सध्या पाणीस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाच्या वतीने पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळेगावपर्यंत पाणी आणण्यासाठी वैजापूर चारीच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तळेगाव परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे.

सिन्नर तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या दमणगंगा-वैतरणा-गोदावरी प्रकल्पात आता संगमनेर तालुक्यातील भागाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी तळेगाव परिसरातील खालच्या पट्ट्यापर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे या दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात नव्या उद्योगांसाठी गुंतवणूकदार उत्सुक असून जमिनीची मागणी वाढत आहे. शिर्डी येथे लवकरच एका मोठ्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे. तरुणांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन जिल्ह्यात रतन टाटा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या माध्यमातून तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशा प्रकल्पांमुळे आगामी पिढीचे भविष्य उज्ज्वल होणार असल्याने युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.

आमदार अमोल खताळ म्हणाले, या नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे भागवतवाडी, वामनवाडी, जुने गाव आणि काकडवाडी परिसरातील सुमारे ९०० शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पूर्ण दाबाने त्रि-फेज वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळण्याची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे रात्री शेतीला पाणी देण्याचा त्रासही कमी होणार आहे.

निळवंडे धरणाच्या माध्यमातून गायत्री खदानीत पाणी सोडून तळेगाव परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे दमणगंगा-वैतरणासारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पात संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश झाला आहे. तसेच बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्यामुळे या परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याचे आमदार खताळ यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!