तालुक्याला हक्काचे पाणी आणि 11 तास वीज मिळालीच पाहिजे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट
खांडगाव येथे थोरात कारखान्याच्या वतीने ऊस विकास मेळावा संपन्न
संगमनेर ( प्रतिनिधी ) निळवंडे धरण आणि डावा व उजवा कालवा आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले. संगमनेर तालुक्याने पाण्यासाठी नेहमीच संघर्ष केला असून निळवंडे धरणाचे 60 टक्के पाणी हे संगमनेर तालुक्याचे आहे. संगमनेरला हक्काचे पाणी व 11 तास वीज मिळालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालयात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी किसन दादा गुंजाळ हे होते तर व्यासपीठावर ॲड.माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पा.घुले, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ.अशोक कडलग, डॉ.अभिनंदन पाटील, रामहरी कातोरे, आर.बी.राहणे, रमेश गुंजाळ, कारखान्याचे संचालक विनोद हासे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, संपतराव गोडगे, बंडू नाना भाबड, सतीश वर्पे, अंकुश ताजने, विलास शिंदे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, सौ.लताताई बाबासाहेब गायकर, सुंदराबाई रावसाहेब दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला संघर्षाचा इतिहास आहे. निळवंडे धरण व कालवे आपण मोठ्या अडचणीवर मात करून पूर्ण केले. डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सुरू आहे. डाव्या कालव्याला काँक्रिटीकरण केल्याने पाणी पुढे जात आहे. संगमनेरला हक्काच्या पाण्याबरोबर न्यायालयाच्या निर्णयानुसार रोटेशन काळामध्ये 11 तास वीज मिळालीच पाहिजे अशी मागणी मागणी त्यांनी केली. याकरता कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी नागरिकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल.

ऊस व दूध हे शाश्वत पीक असून उसाचे क्षेत्र वाढवणे आणि एकरी 100 टन उत्पादन घेणे हे उद्दिष्ट शेतकऱ्यांनी ठेवले पाहिजे. तीच जमीन तेच पाणी आणि कमी श्रम यात एकरी 100 टन उत्पादन घेतल्याने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी येणार आहे. तालुका कार्यक्षेत्रात 15 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवले तर कारखाना स्वयंपूर्ण होऊन कायम सर्वाधिक दिला जाईल असे ते म्हणाले.
तर शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या ऊस विकास मेळाव्यांमधून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होत असून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. पाचटाचा वापर हा खत म्हणून करा पाचटामध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असल्याने हे खत जमिनीसाठी अत्यंत पोषक आहे. चांगले बियाणे, ठिबक सिंचन व ठिबक मधून खते देण्याचे प्रमाण याचबरोबर सरी मधील पाच फूट अंतर महत्त्वाचे असून नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक शेतकऱ्याने वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चंद्रकांत कडलग, ऊस उत्पादक रवींद्र भोकनळ,सतीश खताळ, मधुकर गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, सुभाष गुंजाळ, मोहनराव करंजकर, शांताराम दुबे, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यासह विविध ऊस उत्पादक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.
तीन महिने अगोदर नोंदणी कराऊस लागवड करताना सर्व शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंदणी ही तीन महिने अगोदर करावी. त्यानंतर कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या वतीने माती परीक्षण, ऊस बेणे, औषध याबाबत सर्व मार्गदर्शन केले जाईल. ऊस लागवड आणि ऊस तोडणी यामध्ये नियोजन करणे आवश्यक असल्याचे मा.कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
