संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे पारेगावात भक्तीमय स्वागत
वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध – आमदार खताळ
संगमनेर / प्रतिनिधी
रिमझिम पावसाच्या हलक्या सरी, हिरवाईने नटलेला परिसर, टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद आणि ‘राम कृष्ण हरी… जय जय राम कृष्ण हरी…’, ‘ज्ञानोबा-तुकाराम…’ तसेच ‘संत निवृत्तीनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने संपूर्ण पारेगाव बुद्रुक परिसर रविवारी (दि. ५) भक्तिरसात न्हाऊन निघाला. या पालखीचे आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, प्रांताधिकारी अरुण उंडे आदींनी स्वागत केले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे पारेगाव बुद्रुक (ता. संगमनेर) येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी हजारो वारकरी, दिंड्या, टाळकरी, मृदुंगवादक आणि महिला वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे आगमन होताच ग्रामस्थ, भाविक आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते.

यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश टावरे, पालखी सोहळ्याचे मानकरी जयंत महाराज गोसावी, मोहन बेलापूरकर महाराज, बाळकृष्ण महाराज डावरे, रामकृष्ण महाराज लहवितकर, तसेच श्री संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान त्र्यंबकेश्वर चे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके, पालखी सोहळा प्रमुख माधवदास महाराज राठी, सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, निलेश महाराज गाढवे, ॲड.सोमनाथ घोटेकर, कांचनताई जगताप, नारायण दादा मुराड, अमर बोंबरे ,भीमराज चत्तर,विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, डॉ संतोष डांगे, दत्तात्रय दिघे , रमेश काळे

कैलास गोर्डे , सुरेश दळवी, किशोर गडाख,बाबासाहेब गोरडे, सुनील वाकचौरे ,सुनील गडाख ,भीमराज गडाख,रावसाहेब गडाख, मधुकर गडाख, सोपन एलके, निलेश गडाख,बाळासाहेब गडाख, रोहित चौधरी ,गणेश सानप, अण्णासाहेब काळे,उपस्थित होते.
मान्यवरांनी पालखीचे पूजन केले. पालखीच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखीचे आगमन होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळकरी विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर सादर केलेल्या स्वागताने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. वारकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा गजर सुरू असताना संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक वारकरी आणि महिला भाविकांनी पारंपरिक फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. भाविकांच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळत भक्तिरसात सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली. तसेच वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधून विचारपूस केली.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सलग दुसऱ्या वर्षी स्वागत करण्याचा मान मला लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील सर्व दिंड्यांतील वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकऱ्यांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शासनाकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे.
