सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तळेगावात आज महत्त्वपूर्ण बैठक
संगमनेर / प्रतिनिधी
सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची महत्त्वपूर्ण बैठक आज बुधवार दि. २७ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक सकाळी १०.३० वाजता तळेगाव दिघे येथील राम मंदिर परिसरात पार पडणार असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

महामार्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून, बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प दर देण्यात आल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी, नोटिसा, हरकती व पुढील भूमिका याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या बैठकीस सुरत-चेन्नई महामार्ग बाधित सर्व शेतकरी बांधव व प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनी संदर्भातील नोटीस व संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
