पुणे – नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वाचा टप्पा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका  ऑगस्टच्या जनआंदोलनातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार जनभावना

संगमनेर (प्रतिनिधी) पुणे – नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात राज्य शासनाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून या निर्णयाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांनी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे – नाशिक सरळ रेल्वेच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार आता समितीची स्थापना करण्यात आली असून, पुढील ६० दिवसांत समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.

या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना आमदार तांबे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे सुरुवातीपासून सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. पुणे – नाशिक सरळ रेल्वेच्या मागणीबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असून, तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून या प्रकल्पाबाबत वस्तुनिष्ठ अभ्यास होऊन सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

पुणे – नाशिक सरळ रेल्वेची मागणी ही केवळ एका रेल्वे मार्गापुरती मर्यादित नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, आंबेगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्याला जोडणारा सरळ रेल्वे मार्ग उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती दिनानिमित्त सकाळी 9 वाजता पुणे – नाशिक महामार्गावर होणारे चक्काजाम जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नसून पुणे – नाशिक सरळ रेल्वेच्या समर्थनार्थ आहे.

शासनाच्या सकारात्मक भूमिकेला बळ मिळावे आणि केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या तीव्र भावना प्रभावीपणे पोहोचाव्यात हा या आंदोलनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांनी रेल्वे पळवली तेच आता श्रेय घेण्यासाठी पत्रक बाजी करत आहे

नाशिक – पुणे सरळ रेल्वे ही नियोजित होती मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्यांनी रेल्वेचा मार्ग बदलला. आणि ज्या संगमनेरच्या लोकप्रतिनिधीने हा मार्ग बदलण्यासाठी पाठिंबा दिला तेच आता पत्रक बाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आंदोलन हे संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी असून नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय युवक युवती व नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन होणारच आहे. अभी नही तो कभी नही या रेल्वेसाठीच्या रास्ता रोको आंदोलनामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

रेल्वे संघर्ष समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!