शिर्डीमार्गे वळवलेल्या नव्या आराखड्याचा पुनर्विचार करा, खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली/शिर्डी: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर–संगमनेर(अकोले)–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट नाशिक–पुणे जोडणी द्यावी, अशी ठाम मागणी शिर्डीचे खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वाकचौरे यांच्यासह खा.राजाभाऊ वाजे, खा.अमोल कोल्हे, खा.भास्कर भगरे यांनी मंगळवार (दि. 16 डिसेंबर) रोजी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन जनतेच्या भावना प्रत्यक्षरित्या मांडल्या. या भेटीत नाशिक आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी केंद्रांदरम्यान थेट रेल्वे जोडणीची दशकांपासूनची मागणी आता निर्णायक टप्प्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, GMRT संवेदनशील क्षेत्र टाळण्याच्या कारणामुळे मार्ग बदलला जात असला तरी मूलभूत प्रश्न कायम राहील असे नमूद केले.
संसदेत उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रस्तावित रेल्वे मार्गाला शिर्डी आणि अहिल्यानगरमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला असून, नारायणगावजवळील Giant Metrewave Radio Telescope (GMRT) च्या संवेदनशील रेडिओ-क्षेत्रामुळे हा बदल करण्यात आल्याचे स्पष्ट म्हंटले होते. मात्र, या वळवलेल्या मार्गामुळे प्रकल्पाचा मूळ हेतू, प्रवासाचा कालावधी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने होणारी प्रचंड हानी याकडे लक्ष वेधत “नाशिक–पुणे हा मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक त्रिकोणाचा कणा आहे. लाखो प्रवासी, कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या दोन शहरांदरम्यान दैनंदिन प्रवास करतात. शिर्डीमार्गे वळवणीमुळे या सर्वांच्या हितावर गदा येणार आहे.” त्यामुळे हा मार्ग थेटच असावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या रेल्वे मार्गासाठी नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक, उद्योगसंस्था, शैक्षणिक संस्था आणि कृषी बाजारपेठांकडून थेट जोडणीचीच मागणी जोरदारपणे होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांगितले की, “नाशिक–पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प हा केवळ प्रवासी सुविधा नसून उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक वृद्धीचा महामार्ग आहे. त्याला वळसा घालणे म्हणजे या भागाचा विकास रोखण्यासारखे आहे.

असे मत यावेळी खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले.
यावेळी संसदेतील सहकारी खा.
श्री राजाभाऊ वाजे, खा. अमोल कोल्हे, खा. भास्कर भगरे हे देखील उपस्थित होते.
